नागेश ईटेकर (तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरी: तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच स्थानीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी दारूचा महापूर ओसंडुन वाहत असुन सुद्धा पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. गोंडपिपरी शहरातच नाही तर तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात अवैध देशी विदेशी दारु चा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र आहे.
त्याचप्रमाणे जिल्हातील डोंगर वाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू काढल्या जाते. जिल्ह्यात दारू बंदी असल्याने रोज पिणाऱ्या तळीरामांचा मोर्चा हा गावठी दारू तसेच देशी दारू कडे वळला असून गावात तळीरामांच्या आवक जावक संख्येत वाढ झाली त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे गावातील गल्लो गल्लीत स्थापन झाले आहे.
गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्हयातील विविध ग्रामीण भागात हातभट्टी आणि गावठी दारूच्या उत्पादनांसाठी जंगलांचा वापर केला जात आहे. त्यामुळे जंगल ऱ्हास पावत आहे.
पिनाऱ्याच्या संख्येत जसजशी वाढ होत आहे तसतशी विक्रेत्यांची लालसा वाढत असल्याने विषारी रसायन वापरुन रातोरात दारूचे महसुली उत्पादन केल्या जात आहे.विक्रेत्यांच्या या लालसेपोटी गावात आता विषारी स्वरूपातील दारू उपलब्ध होत आहे. सुरुवातीला गावठी दारु तयार करण्यासाठी नवसागर काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. आता दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. विषारी दारुच्या सेवणाने कित्येक लोकांचे नाहक बळी गेले आहे शिवाय बऱ्याच लोकांना विषबाधा सुद्धा झाली आहे.
गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहेत. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसपंदा अडचणीत येत आहे. त्यामुळे वनविभागानेही आता अवैध दारू निर्मात्यांच्या विरोधात पुढे येणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाया केल्या जात असल्या तरी अवैध दारूची वाहतूक अजून थांबलेली नाही. दोघांच्याही कारवायांचा तुलनात्मक अभ्यास केला तर अवैध दारू वाहतूक करणार्यांपेक्षा विक्री करणाऱ्यांवर कारवाई जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत अवैध दारू ची (पार्सलिंग) वाहतुक करणाऱ्या मुख्य आणि मोठ्या माश्यांवर कठोर स्वरूपाची कार्यवाही होणार नाही तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही.
गोंडपिपरी येथील नवीन पाण्याच्या टाकीजवळ ,इंदिरा नगर वार्ड , पंचशील वार्ड, बाजार रोड, हनुमान मंदिर व्यंकटपुर रोड इत्यादी महत्वाच्या ठिकाणी सर्रास आणि खुलेआम दारू विक्री होत असते.लहान मुलांपासून तर नवयुवक तरुण मंडळी या याव्यवसायात अडकले आहेत. मुलांच्या शाळेतील दप्तरात पुस्तकां ऐवजी दारूच्या बाटल्या भरून आढळल्याचे बरेच प्रकरन समोर आले आहे. या वरून असे समजते की, तरुण पिढी नशेच्या आहारी तर गेलीच पण गुन्हे गारीच्या पाश्र्वर्भुमित सुद्धा उतरलेला दिसते. जिल्ह्यात दारू बंदी सबशेल फेल ठरली आहे. दारू बंदी झाली आणि तरुणांना अवैध धंद्यात अडकवून टाकली आणि कमाई खाकी व काळ्या रंगांना करून दिली असे म्हणायला हरकत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षापासून दारू बंदी असताना शहरातील तसेच ग्रामीण भागातील कचराकुंडीत, गटारीत, पडीत जागेत ,ओस पडलेल्या सार्वजनिक विहिरीत देशी व विदेशी दारुच्या बाटल्यांचा ढीग कसा ? ह्या बाटल्या आल्या कोठून ? असा प्रश्न गोंडपिपरी तालुक्यातीलच नाही तर जिल्हयातील बहुतांश नागरिकांनी उपस्थित केला आहे.