अहेरीत बंदुकीच्या जोरावर पोलिसांची गुंडागिरी… काहीही कारण नसतांना पोलिसांकडून युवकाला जबर मारहाण…

3727

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी: तालुक्यातील अहेरी- कन्नेपल्ली मार्गावर काल दि, ०५.०७.२०२२ रात्री १२.३० वाजता अहेरी पोलिसांकडून जबर मारहाण आणि बंदुकीच्या जोरावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली अशी लेखी तक्रार अहेरी येथील युवकाने उपविभागीय अधिकारी अहेरी यांना केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, रोहन अनिल शुध्दलवार, रा. अहेरी हा तरुण कन्नेपल्ली येथील शेती कामावर जावून येतांना मौजा अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनी मधील साई मंदिराजवळ दोन पोलीस शिपाई घनश्याम तोडासे व विनोद रणदिवे रात्रीच्या गस्तीवर होते. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोन शिपाई पोलिसाने सदर युवकास अडवून कुठे जावून येत आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, मी कन्नेपल्लीला शेती कामाकरीता जावून येत आहे आणि आता मी माझा मित्र जिवन मंत्रीवार यांच्या घरी जात आहे. युवकांवर शंका आल्यावर पोलीस शिपाई यांनी जीवन मंत्रीवार याला बोलावायला सांगितले असता रोहन मित्राला फोन करून बोलविले, तेव्हा जीवन मंत्रीवार नामक युवक साई मंदीर येथे काही वेळात पोहचला..

मोक्यावर जाऊन जीवन स्वतःचा परिचय देऊन रोहन शुध्दलवार हा माझा मित्र असून हा माझ्याच घरी येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आम्ही जायचा का म्हणून विचारले असता पोलीस शिपाई दारुच्या बेधुंद नशेत तुला एवढी घाई कशाची आहे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर जीवन यांनी शिवीगाळ कशाला करून राहिले साहेब? असे उत्तर दिल्यावर जीवनला मारहाण करण्यासाठी पोलिस जवळ आले. तेवढ्यात जीवन घाबरून किष्टापूर रस्त्याकडे पळाला. परंतु पोलीस शिपाईने त्यांच्या दुचाकीने दोन्ही युवकांचा मागे येऊन किष्टापूर फाटयाजवळ पकडून त्यांना लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. जीवन यांनी पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलीस शिपाई रणदिवे यांनी त्यांच्याजवळील पिस्टल काढून जीवनच्या डोक्यावर लावली आणि तुला मारून नक्षलवादी ठरवणार अशी धमकी दिली.

पोलिसांनी युवकाला मारहाण केल्यानंतर पोलीस शिपाई घनश्याम तोडासे व विनोद रणदिवे यांनी पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांना किष्टापूर मार्गावर बोलाविले. गव्हाणे यांनी आपल्या खाजगी कारने मोक्यावर येऊन सदर युवकाच्या गालावर ३-४ थापड मारले. त्यानंतर युवकाने गव्हाणे यांना विनंती करून माझ्या वडीलांना फोन करून बोलविण्यास सांगितले. तेव्हा गव्हाणे यांनी जीवनच्या वडिलांना फोन करून साई मंदीराजवळ बोलाविले. तेव्हा जीवनच्या वडिलांनी म्हणाले कि, माझ्या मुलाची काहीही चुक नसताना मारहाण केल्यामुळे मी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देतो. तेव्हा गव्हाणे यांनी तुम्ही तक्रार दिले तर आम्ही तुमच्या मुलावर कलम ३५३ व ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करणार म्हणून धमकी दिली… अशाप्रकारे सर्व प्रकार घडल्याचे सदर युवकाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी अर्जातून सांगितले आहे. लोकांचे रक्षण करणारेच कायद्याचे उल्लंघन करुण खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असतील सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे न्याय मागायचा असा सूर जनतेतून निघत आहे..