नागपूर : मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुष गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे.
या अहवालानुसार, तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (३८.२ टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (३४.७ टक्के) प्रथम क्रमांक लागतो.
राज्यात मद्यव्यसनात महिलांचे प्रमाण ०.४ टक्के तर पुरुषांचे १३.९ टक्के आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त प्रमाणात मद्य प्राशन केले जाते. राज्यात दारू पिणाऱ्या महिलांमध्ये धुळ्यानंतर गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानी असून यानंतर नंदुरबार व पालघर या जिल्ह्याचा क्रमांक लागतो. पुरुषांमध्ये गडचिरोलीनंतर भंडारा, वर्धा व गोंदिया या विदर्भातीलच तीन जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही तिथे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे.
राज्यात १६ ते ३५ वयातील तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. दारू आणि हुक्का पिणाऱ्यांमध्ये तरुणींचेही प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील मुलींना दारूच्या व्यसन जास्त आहे.
अनेक शहरात देशी दारूची दुकाने, वाईन शॉप आणि बिअर बार आहेत. मात्र, त्यापेक्षाही जास्त प्रमाणात गल्लीबोळात मोहफुलाची दारू आणि देशी दारूची अवैध विक्री करण्यात येते. अशा दारूविक्रेत्यांकडून पोलीस हप्ते घेत असल्यामुळे लपूनछपून होणारी दारूविक्री आता थेट चौकात पोहचली आहे. महामार्गावरील ढाब्यांमध्ये, हॉटेलात दारू सर्रास उपलब्ध होते, त्यासाठी पोलीस वेगळी रक्कम घेत असल्याची माहिती आहे.