गोंडपिपरी – तालुक्यातील सकमुर (चेकबापुर) येथे शनिवार, दि. १८ मे २०२४ रोजी सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राजेश विश्वनाथ झाडे (वय ४८ वर्ष) असे शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी आपल्या स्वतःच्या घरीच आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना गत काही वर्षांपासून शेतीत अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत राजेश झाडे यांनी विष प्राशन केले.
शनिवारी सकाळी राजेश झाडे हे आपल्या शेतात फेरफटका मारून घरी आले. त्यानंतर त्यांनी शेतात दरवर्षी होणाऱ्या नापिकीमुळे आणि वाढत्या कर्जामुळे चिंताग्रस्त होऊन मिरची पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले औषध प्राशन करून स्वतःची जीवनयात्रा संपविली.
विष प्राशन केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र फवारणी औषधाची मात्र मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्याने उपचारादरम्यान त्यांना मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.