तस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद

983

सिमावर्तीत भागात संताप

गोंडपिपरी- आकाश चौधरी

अवैध दारूतस्करी -चोरीच्या तांदळाची वाहतूक आणि कोरोना प्रवाशांना रोखण्यासाठी तेलंगणा सरकारने चक्क आंतरराज्य मार्गच खोदून काढलाय. तेलंगणा सरकारची अरेरावी विविध घटनांमधून सतत पुढे येत असते. ताजा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात पोडसा गावालगत घडलाय.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वर्धा नदीच्या घाटावर पुलाची निर्मिती केल्या गेली. महाराष्ट्राच्या सा. बां. विभागाने भला थोरला पूल बांधून दोन राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या दळणवळणाची उत्तम सोय केली. मात्र, आता तेलंगणा सरकारने या मूळ भावनेलाच सुरुंग लावत आंतरराज्य महामार्ग खोदून नागरिकांची मूलभूत सुविधा हिरावून घेतली आहे. तस्करीला आळा घालण्यासाठी नाकाबंदी केली जाते. पोलीस तैनात केले जातात. चौकी स्थापली जाते. गुप्त माहितीच्या आधावर धाड टाकली जाते. मात्र, तस्करीला आळा घालण्यासाठी मार्ग खोदण्याचा हा नवा विचित्र प्रकार पुढे आला आहे. गेली काही वर्षे तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ आणि दारू सीमावर्ती भागात येवू लागली आहे. हे रोखण्यासाठी पोलीस चौकी लावली गेली, पाळत ठेवली. मात्र, त्यात अपयश आले आहे. या प्रकाराला वैतागलेल्या तेलंगणा राज्यातील सिरपूर प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील मार्गच आरपार खोदून काढला. महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणा-या पोडसा पुलाजवळ हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सीमावर्ती भागातील नागरिक विविध कामे घेऊन तेलंगणा राज्यातील सिरपूर  गाठतात. टाळेबंदीत राज्याची सीमा बंद होती. नुकतीच सीमा खुली करण्यात आल्याने या मार्गाने ये-जा सुरू झाली होती. आता कोरोना संकटकाळी रुग्ण रोखण्यासाठी हा फंडा वापरला गेला का, अशीही शंका व्यक्त होत आहे. तेलंगणा राज्याच्या या कृतीने सीमावर्ती भागात संताप व्यक्त केला जात आहे.