नरभक्षी हिंसक वाघाला ठार मारा- आमदार सुभाष धोटे

349

राजुरा (ता.प्र) :– मध्य चांदा वनविभागात येत असलेल्या राजुरा, विरूर स्टेशन वनपरीक्षेत्रातील नरभक्षी हिंसक वाघाच्या हल्लात 10 शेतकरी शेतमजुरांचा नाहक बळी गेला आहे.
आज दिनांक 12/10/2020 रोज ला तहसील कार्यालय राजुरा येथे परिसरातील शेतकऱ्यांच्या समवेत धरणे आंदोलन करण्यात आले.
दिनांक 16 जानेवारी 2019 ला मौजा खांबाडा येथील वर्षा तोडासे नामक गरीब आदिवासी महिला सरपनाची लाकडे गोळा करीत असतांना तिचेवर हल्ला करून पहिला बळी घेतला होता त्यानंतर मुर्ती येथील श्रीहरी साळवे व राजुरा येथील मंगेश कोडापे या दोन शेतकरी शेतमजुरांवर हल्ला करून नरभक्षी वाघाने बळी घेतला आहे. 2020 या वर्षात आतापर्यंत 7 शेतकरी व शेतमजुरांना ठार मारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या दिड वर्षाच्या कार्यकाळात नरभक्षी वाघाने राजुरा व विरूर वनपरीक्षेत्रात 10 इसमांवर हल्ला करून ठार मारले आहे. सोबतच 4 शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केल्याने त्यांना अपंगत्व आलेले आहे. अशा परीस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा जिव गेल्यामुळे त्यांचे कुंटुब अक्षरशः उघडव्यावर पडले आहे. घरचा कर्ता पुरूष गेल्याने अनेकांच्या कुटुंबांची वाताहत झालेली आहे. त्यांच्या जिवाचे मोल हे पैशात मोजता येणार नाही.
मध्य चांदा वनविभाग अंतर्गत राजूरा, विरूर स्टेशन वनपरीक्षेत्रात येणाऱ्या जंगल व्याप्त परीसरातील गावांमध्ये मागील काही दिवसांपासुन नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात आज पर्यंत एकुण 10 शेतकरी व शेतमजुरांचा नाहक बळी गेलेला आहे. शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवर दिवसागणिक वाघ आक्रमण करून नाहक बळी घेत असल्याने वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे परीसरात शेतीचे काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांचा जिव टांगणीला लागला आहे. आजच्या परीस्थितीत उभ्या पिकांची जागल करणे त्यांना भिती दायक वाटु लागले असल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिक गमवावे लागणार आहे.
शेतात पिकांची लागवड केलेली असुन कपासी वेचणी व इतर शेत पिकांच्या निंदन खुरपना करीता शेतकऱ्यांमध्ये शेतीकडे जाण्यासाठी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच परिसरातील शेतकरी बांधवांना गुरे ढोरे चारण्याचा व शेतकऱ्यांनी शेतीची कामे कशाप्रकारे करायची हा ज्वलंत प्रश्न जंगल व्याप्त परीसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. जेरबंद मोहिमेत वाघ हल्ले करून शेतकऱ्यांना ठार मारत असल्याने नागरीकांकडुन या मोहीमेवर संताप व्यक्त केला जात आहे. आता तरी वनविभागाने नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मोहिन गुंडाळुन ठार मारण्याची मोहीम राबवावी अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे याबाबत वनविभागागने वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत तातडीने मोहीम राबवावी अन्यथा जंगल व्याप्त परीसरातील नागरीकांसह मोठे आंदोलन छेडण्यात येईल.