प्रेरणादायी: लॉकडाऊनमुळे रोजगार गेला अन त्याने केली ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ या ब्रँडची निर्मिती…

607

चंद्रपूर : मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर या गावाचा तो. पुण्या-मुंबईत मातब्बर गायक सेलिब्रिटींना तबला वादनाद्वारे साथ देत होता. पण जगात कोरोना आजाराने धुमाकूळ घातला आणि त्याच्यावर संकट आले. तरीही तो डगमगला नाही, हिम्मत करून कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर त्याने मात केली आहे. सोबतच एका नवीन बँडची निर्मिती करून तरुणापुढे आदर्श ठेवला. अश्या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे शुभम देवाळकर.
शुभमने बल्लारपूर शहरात सहा लाख रुपये भांडवलाची गुंतवणूक करत ‘विदर्भ अमृततुल्य’ चहाचा ब्रँड बनवला आहे. कोरोना काळात मैफिली बंद झाल्याने शुभमच्या आयुष्याला वेगळी वाट मिळाली आहे. जे हात तबला-सिंथेसायझरवर लीलया फिरतात त्याच हातांनी शुभम आज वाफाळता चहा सर्व्ह करतोय.
शुभम देवाळकरने संगीत-वादनाचे शिक्षण चंद्रपूर मधून पूर्ण केले. पुढे पुण्या-मुंबईत सेलिब्रिटी कलाकारांना विविध वाद्यांची संगत केलीय. लॉकडाऊनमुळे संगीत कार्यक्रम बंद झाले त्याची आर्थिक परिस्थिती बिघडत होती. यावर मात करण्यासाठी त्याने पुण्या मुंबईत पाहिलेल्या चहा विक्री करणाऱ्या ब्रँडच्या धर्तीवर स्वत:चा ब्रँड तयार केला आहे.
तबला- ढोलकी -नाल यावर त्याची विशेष हुकमत आहे. मुंबई-पुण्यात आणि बॉलीवूडमध्ये वादनाच्या अनेक संधी येत गेल्या आणि सोबतच उत्तम मिळकतही होत गेली. मात्र, फेब्रुवारी- मार्च महिना उजाडताच जगासह संगीत मैफलीच्या कार्यक्रमांना कोरोनाचा फटका बसला. पुण्यात राहून शुभमने 2 महिने हे संकट टळण्याची प्रतीक्षा केली. या काळात कुठलेही कार्यक्रम नसताना आर्थिक आघाडीवर तो ढासळत गेला.
जगण्याची चिंता सतावू लागल्यावर शुभमने गावी विसापूर येथे परतण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे असलेली रक्कम आणि मनात घोळत असलेला नवीन उद्योगाचा विचार याचा मेळ घालत त्याने जिद्दीने लगतच्या बल्लारपूर औद्योगिक शहरात चहा विक्रीचे दुकान थाटण्याचे ठरविले. बँकांकडून कर्ज घेत जागेची जुळवाजुळव आणि साहित्य उभारून शुभमने ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ नावाचा ब्रँड विकसित केला.
बल्लारपूर शहरातल्या पंचतारांकित बस स्थानकाच्या बाजूला एका व्यापार संकुलात गेले काही महिने शुभम देवाळकर आपल्या परिवारासह हा चहाचा ब्रँड शौकिनांना सर्व्ह करतो आहे. पुणे- मुंबईत असलेली रोजगाराची संधी हरवल्यानंतर निराश न होता शुभमने जिद्दीने उचललेले हे पाऊल कोरोनाने अर्थात संकटाने त्याला दिलेला धडाच ठरला आहे.
पुणे मुंबईत असतानाच तिथल्या चहाच्या उत्तम ब्रँडचा अभ्यास करून त्याने त्यातले प्राथमिक कौशल्य मिळवले होते. एकीकडे उत्तम कलागुण असताना सुटलेला रोजगार तर दुसरीकडे नव्या उद्योगाच्या माध्यमातून नव्या ग्राहकांपुढे आपले उत्पादन घेऊन जाण्याची संधी त्याने नेमकी हेरली. सध्या बल्लारपूरात त्याच्या या ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ ला मोठा प्रतिसाद लाभतो आहे.
वाचक मित्रांनो एकदा नक्की शुभमच्या ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ ला भेट द्या…